पावसाळ्यात तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे झाले हाल
तालुक्यातील दाबगाव तुकूम येथील मामा तलाव फुटल्याने परिसरातील शेकडो शेतकरी बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित व्हावे लागले होते. येत्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित होऊ नये यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या उपविभागीय अधिकारी जलसंधारण उपविभाग मूल येथे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने या वर्षाच्या हंगामात शेकडो शेतकरी पिकांपासून वंचित राहण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साहेब, तलावाची पाळ केव्हा बुजविणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावातील
मामा तलाव दाबगाव तुकुम म्हणून ओळखला जात असुन सर्वे नंबर ७२ असलेल्या या तलावाजवळ शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत.शेतीच्या पिकासाठी हा वरदान असणारा हा तलाव असुन या तलावाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे या तलावाची पाळ कमकुवत होत गेली. मागील जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने तलाव तुडूंब भरला.तलावाच्या दुरूस्ती अभावी तलावाची पाळ कमकुवत झाल्याने तलावातील पाणी रोखण्यास असमर्थ झाली. त्यामुळे संपुर्ण पाण्याचा लोंढा तलावाच्या पाळीवरून वाहायला लागले. याचा परिमाण असा झाला की,परिसरात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्याच बरोबर शेतात रेतीचे ढग देखील जमा झाले. त्यामुळे शेतकरी पिकांपासून वंचित होत असल्याने तहसीलदार मूल यांचेकडे याबाबतची आपबिती सांगितली. तालुका प्रशासनाने पंचनामा केला मात्र तुटपुंजी मदत काही महिन्यांनी करून बोळवण घातली. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतातील रेती उचलण्याची मागणी करीत पडलेले खड्डे सुव्यवस्थित करून तलावाची पाळ बुजविण्याची मागणी केली.मात्र बरेच महिने लोटत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील हंगाम मे जून महिन्यात सुरू होणार असल्याने येत्या महिन्यात तलावाची दुरूस्ती करीत तलावाची पाळ बुजविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाचे पाणी तलावात जमा होणार नाही पर्यायाने शेतकऱ्याच्या हातात पिक येणार नाही. पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी मुक्त व जलसंधारण अधिकारी मूल यांना निवेदन देऊन मागणी केली असुन सतत पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
यादव बुरांडे शेतकरी दाबगाव मक्ता :-मागील पावसाळ्यात मुसळधार पावसाने दाबगाव मक्ता येथील मामा तलाव फुटल्याने शेकडो शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचून अतोनात नुकसान झाले होते. आज पाळीला बुजवले नसल्याने पावसाचे पाणी साचणार नाही. पर्यायाने पिक पिकविण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
