ग्रामपंचायत चिरोली ला पाच वर्षात मिळाले १ कोटी ८२ लाख रुपये मात्र कामाचा दर्जा निकृष्ठ !


      जनतेची चौकशीची मागणी 



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  मूल तालुक्यातील आदर्श म्हणुन ओळखली जाणारी चिरोली ग्राम पंचायतीला सन २०२० ते सन २०२५ पर्यंत गावातील विविध विकास कामे करण्यासाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये शासनाकडून प्राप्त झाले.ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विजय यारेवार यांच्या देखरेखीखाली ही कामे करण्यात आली मात्र सर्वच कामाचा दर्जा निकृष्ठ स्वरूपाचा असुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची शंका जनतेनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
      शासन गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट ग्राम पंचायतीच्या बँक खात्यात विकास निधी जमा करीत आहे. ग्राम पंचायत कमिटीचे सदस्य व ग्रामसेवक यांच्या  देखरेखीखाली गावचा विकास होईल हाच उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. मात्र ग्राम पंचायत चिरोली याला अपवाद आहे. सन २०२० ते २०२५ पर्यंत शासनाकडून विविध विकास कामांसाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये प्राप्त झाले. यात कंत्राटदारांना हाताशी घेऊन ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार यांनी स्वर्जीने कामे केल्याची चर्चा सुरू झाली आहे.लोकांच्या हिताच्या दृष्टीने एकही चांगले काम केले नसल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत.गावाच्या विकासासाठी आलेला निधी काही मोजक्या ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेत हा १ कोटी ८२ लाख रुपयांचा खेळ मांडला गेला आहे. आजच्या घडीला गावात फेरफटका मारला असता कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचा प्रत्यय दिसुन येत आहे. ग्राम पंचायत चिरोलीला मिळालेला निधी हा आपलाच आहे तो वाट्टेल तसा खर्च करीन हा गर्व ग्राम विकास अधिकारी यारेवार यांच्यात शिरल्याने माझे कुणीही वाकडे करू शकत नाही अशा आविर्भावात वागताना दिसत आहे. ग्राम पंचायतीला केव्हाही यायचे व केव्हाही जायचे हा त्याचा दररोजचा धंदा बनला आहे. करोडो रुपयांची निधीची वाट लावणाऱ्या अशा अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी जनतेनी केली आहे.यासंदर्भात लेखी तक्रार जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांचेकडे करणार असल्याचे कुणाचे नाव न सांगता सांगितले आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात १ कोटी ८२ लाख रुपये लटकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.



सुभाष बुक्कावार माजी सरपंच ग्रा. प,चीरोली

 
ग्राम पंचायत चिरोली ला गाव विकासासाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र या निधीतून बांधण्यात आलेले काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत. आपल्या मनमानी कारभाराने काही कंत्राटदारांना हाताशी धरून हे काम करण्यात आले आहे. या कामाची चौकशी झाल्यास अनेक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी होणे गरजेचे आहे.